Skip to main content
अनुभवा वाघांच्या पलीकडचे जंगल



रंग बदलणारे सरडे, सरपटणारे प्राणी, वैविध्यपूर्ण रंग आणि मधुर शीळ घालून आकर्षित करणारे पक्षी, फुलपाखरे, आपली नजर चुकवून सभोवताली फिरणारे गवताळ प्रदेशातील प्राणी अन् आकर्षक फुलांनी बहरलेले डेरेदार वृक्ष बघण्यातही एक वेगळी मजा आहे. वाघांचे अस्तित्व नसलेल्या अभयारण्यांकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वन विभागाने पुढाकार घेतला आहे. पुणे विभागातील मयुरेश्वर चिंकारा अभयारण्य, रेहेकुरी काळवीट अभयारण्य, भीमाशंकर शेकरू अभयारण्य आणि करमाळा-नान्नज माळढोक अभयारण्य आता वेगळ्या रूपात पर्यटकांसमोर येणार आहे.
...................
चैत्राली चांदोरकर
..................... 

रोजच्या धकाधकीच्या जीवनचक्रातून रिफ्रेश होण्यासाठी सुट्टीच्या दिवशी निसर्गरम्य, शांत ठिकाणी फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढते आहे; पण वाढत्या संख्येमुळे या निसर्गरम्य स्थळांनाही जत्रेचे स्वरूप आल्याचे दिसते. मोठमोठी हॉटेल्स, गेमिंग झोन, शहरी वस्तूंनी फुललेल्या बाजारपेठा अन् वाहतुकीची कोंडी.... हेच चित्र एखाद्या हिलस्टेशनवर अनुभवायला मिळत असेल तर मग शहरातच स्वतःच्या घरातच राहिलेले बरे, अशा निष्कर्षावर पर्यटक आले आहेत. फिरणाऱ्यांच्या संख्येच्या तुलनेत पर्यटनस्थळे मर्यादित असल्याने पर्यटक सध्या नावीन्याच्या शोधात आहेत. मोबाइलला रेंज नाही, गाड्यांची गर्दी नको अशा निवांत ठिकाणासाठी त्यांची शोधाशोध सुरू आहे. पर्यटकांच्या मागणीचा हाच धागा पकडून वन विभागाने आता निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून शहरी नागरिकांना जंगलांकडे आकर्षित करण्याचे नियोजन केले आहे. शहरी संस्कृतीमुळे ग्रामीण जीवन, वनक्षेत्रापासून दुरावलेल्या नागरिकांना पुन्हा जंगलाकडे आणायचे. तसेच जंगलामुळे विकासकामे अडकून राहिली आहेत, अशी मानसिकता असलेल्या गावकऱ्यांना रोजगार मिळवून द्यायचा आणि त्यांच्या सहभागातूनच वन्य प्राण्यांचे संवर्धन करायचे, अशा तिहेरी हेतूने वन विभागाने पुणे परिसरातील अभयारण्यांचा निसर्ग पर्यटन आराखडा तयार केला आहे. पुढील सहा ते आठ महिन्यांत या बहुतांश ठिकाणी पर्यटकांना राहण्याची आणि एकूणच आदारातिथ्याची उत्तम सोय उपलब्ध होणार आहे.
गेल्या काही वर्षांत जंगल पर्यटनाचे आकर्षण खूप वाढले आहे; पण यात वाघ हा प्रमुख केंद्रबिंदू आहे. जंगलात जायचे म्हणजे वाघ बघायचा एवढीच पर्यटकांची मानसकिता दिसते. त्यामुळे व्याघ्रदर्शन न झाल्यास लोक निराश होऊन परतात. जंगलामध्ये असलेले इतर वन्यजीव, वनसंपदेची गुपिते जाणून घेण्यास त्यांना रस नसतो. त्यांची ही विचारसरणी बदलण्यासाठी निसर्ग पर्यटन हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे. वाघ असलेल्या जंगलांमध्ये आता राहायला परवानगी नाही, त्यापेक्षा वाघ नसलेल्या जंगलात राहायला या, गाइड आणि वनसंरक्षकाच्या मदतीने मनसोक्त भटकंती करा, रात्री जंगलात राहण्याचा अनुभव घ्या, असा सकारात्मक दृष्टिकोन निसर्ग पर्यटनाच्या निमित्ताने वन विभाग पर्यटकांना देणार आहे. पर्यटकाला एकदा जंगलातील शांतता आणि निसर्गसौंदर्य भावले की पर्यटकांची पावले पुन्हा पुन्हा जंगलाकडे वळतात, हे गुपित वनाधिकाऱ्यांना माहिती असल्याने या पर्यटनाच्या माध्यमातून जंगल परिसरातील गावांना रोजगार मिळवून देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. 

पुणे वन विभागाअंतर्गत भीमाशंकर शेकरू अभयारण्य, सुपे येथील मयुरेश्वर चिंकारा अभयारण्य, नगरमधील रेहेकुरी काळवीट अभयारण्य आणि नान्नज माळढोक अभयारण्य यांचा समावेश होतो. वनाधिकाऱ्यांनी या चारही अभयारण्यांचा निसर्ग पर्यटन आराखडा तयार केला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या कामाला सुरुवात झाली असून, येत्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांना या जंगलांमध्ये राहण्याचा अनुभव मिळणार आहे. पुणे विभागात भीमाशंकर हे सर्वांत मोठे अभयारण्य असून, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक शंकराचे मंदिर या वनक्षेत्राला लागून वसलेले आहे. भीमाशंकरला जाणारे ८० पर्यटक शंकराचे भक्त असतात आणि २० टक्के गिर्यारोहक असतात. या मंदिरांमध्ये येणाऱ्यांना अनेकांना या जंगलातील वन्यजीवनाबद्दल माहिती नाही. त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अभयारण्यामध्ये वन विभागाने सुंदर तंबू आणि खोल्या बांधल्या आहेत. स्थानिक बचत गटांकडे पर्यटकांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. याशिवाय तेथे उभारलेले निसर्ग परिचय केंद्र पर्यटकांना छायाचित्रांच्या माध्यमातून जंगलाची सफर घडवणार आहे. शेजारच्या ‘सोव्हेनिअर शॉप’मधून पर्यटक जंगलातील आठवणी बरोबर घेऊन जाऊ शकतील. स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देऊन गाइडची जबाबदारी दिल्यामुळे पर्यटकांना जंगलात भटकंती करताना मार्गदर्शनाची जोड मिळणार आहे. याशिवाय अभयारण्याचा अविभाज्य भाग अन् गर्द देवराईचे उत्तम उदाहरण असलेल्या आहुपे या गावात ‘होम स्टे’ची सुविधा सुरू होते आहे. पावसाळ्यामध्ये जंगलातील प्रसिद्ध कोंढवळ धबधब्यामध्ये रॅपलिंगची सुविधा सुरू होणार आहे. यासाठी स्थानिक कर्मचाऱ्यांना दार्जिलिंगला नेऊन प्रशिक्षण दिले आहे. भीमाशंकर हे अभयारण्य हे वनसंपदेने समृद्ध आहे. त्यामुळे घनदाट जंगलाचा अनुभव तिथे मिळतो; पण माळरानात राहण्याचा हटके अनुभव घेण्यासाठी वन विभागाने अहमदनगर जिल्ह्यातील रेहेकुरी काळवीट अभयारण्य आणि सुपे येथील मयुरेश्वर अभयारण्यदेखील निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने सज्ज केले आहे. या दोन्ही अभयारण्यांमध्ये घनदाट झाडे नव्हे, तर नजर जाईल तिथेपर्यंत गवताचे गालिचे बघायला मिळतात. जंगलाची टेहळणी करताना मध्येच एखादे खुरटे झाडे दिसते. या गवतात चरणारी, कधी मनसोक्त उड्या मारत भटकंती करणारी हरणे बघण्यातील मजा औरच असते. निसर्ग पर्यटनामुळे पर्यटकांना आता या दोन्ही जंगलांत तंबूमध्ये राहण्याची, तेथील वन्यजीवन आणि पक्षिवैभव कॅमेऱ्यात टिपण्याची संधी मिळणार आहे. सोलापूर येथील नान्नज- करमाळा अभयारण्यामध्येही लवकरच या सुविधा उपलब्ध होणार आहेत. या सर्वच जंगलांचे वैशिष्ट्य म्हणजे, ऋतूनुसार हे प्रत्येक जंगल प्रत्येक वेळी नव्याने भेटते. उन्हाळ्यात माळराने रुक्ष वाटत असली, तरी तेथील हरणांचे कळप, सूर्योदय आणि सूर्यास्ताचा अनुभव डोळ्यांना सुखावणारा असतो. पावसाळ्यात आणि थंडीत या जंगलांमध्ये राहण्याचा अनुभव आल्हाददायक आणि मनावरचा ताण हलका करणारा ठरतो. भीमाशंकर अभयारण्य वर्षभर हिरवेगार असल्याने तेथील अनुभव अजून वेगळाच असतो. पावसाळ्यात मात्र या अभयारण्यातील अनेक वाटा पर्यटकांसाठी बंदच कराव्या लागतात. 

एक निसर्गप्रेमी म्हणून या जंगलामध्ये तुम्ही मनापासून भटकंती केलीत, तर खूप वैविध्य बघायला मिळते. झुडपांवर मनमुराद फिरणारी रंगीबेरंगी फुलपाखरे, मधुर शीळ घालून आपले लक्ष वेधणारे पक्षी, तर कधी गूढ आवाजाने जंगलातील भयाण शांततेची प्रचिती देणाऱ्यां शिकारी पक्ष्यांच्या धीरगंभीर आवाजाने अंगावर शहारा येतो. आपल्यावर नकळत झाडीतून ‘वॉच’ ठेवणारी हरणे, सांबर, रानडुकरांना शोधण्यात मजा असते. जंगलातील शांततेचा भंग होऊ नये म्हणून आपण कितीही अलगद पाय टाकले, तरी वाळलेल्या पानांतून हलकासा आवाज येतोच आणि तोदेखील आपल्याला नकोसा वाटतो. व्याघ्र प्रकल्पांमध्ये जीप घेऊन ठरलेल्या वाटांवरच फिरावे लागते; पण विशेष म्हणजे या जंगलांमध्ये पायी फिरायला परवानगी असल्याने जंगल वाचनाचा खरा अनुभव येथे मिळतो. सूर्यास्तानंतर झोपणाऱ्या गूढ जंगलात फिरण्यातील थरार अविस्मरणीय असतो.
एकूणच काय, तर वन विभागाने सुरू केलेल्या निसर्ग पर्यटनामुळे यापुढे आपल्याला हौशी, उत्साही आणि ‘उद्योगी’ नसलेल्या पर्यटकांना भटकंतीची नवीन संधी उपलब्ध झाली आहे. या उपक्रमामुळे गावकरीदेखील खूष असून, पर्यटकांच्या आदरातिथ्यास ते उत्सुक आहेत. त्यामुळे वाघ नसलेल्या जंगलात राहण्याची मजा घेण्यासाठी एकदा तरी निसर्ग पर्यटन केले पाहिजे, एवढे नक्की!
..........................

Comments

Popular posts from this blog

आता स्थलांतर वाघांचे   ..................................... व्याघ्र संवर्धनाची दिशा निश्चित करण्यासाठी ‘वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर’ आणि ‘ग्लोबल टायगर फोरम’तर्फे व्याघ्र संवर्धनाची पुढची दिशा ठरविण्यासाठी आशियातील विविध देशांच्या मंत्र्यांची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेदरम्यान वाघांची संख्या अत्यल्प असलेल्या देशांमध्ये वाघांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे भारतातील काही वाघांचे लवकरच कंबोडियात स्थलांतर होणार आहे.   जंगलातील अतिशय देखणा, रुबाबदार आणि राजबिंडा प्राणी असलेल्या वाघाला वाचविण्यासाठी सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जगात शंभर वर्षांपूर्वी तब्बल एक लाख वाघ जंगलात वास्तव्यास होते. घरातील अनेक बुजूर्ग मंडळींनी वाघांचा हा घटता आलेख अनुभवला आहे. राजामहाराजांच्या काळात, अगदी ब्रिटिशांची राजवट संपल्यानंतरही काही वर्षे वाघांना मारण्यासाठी सरकारकडून बक्षीस जाहीर केले जात असे. या काळात बदुंकांच्या साह्याने शिकार करणे सोपे झाल्याने झपाट्...
फॅशन इंडस्ट्रीचे मृगजळ पर्यावरणाच्या मूळावर    मोठमोठ्या हॉटेलमध्ये होणारे फॅशन शो, मॉलमधील काचेच्या कपाटातील कपड्यांनी भारतीय ग्राहकांवर मोहिनी घातली आहे. पण अब्जावधी रुपयांची उलाढाल असलेल्या या उद्योगक्षेत्रातून लाखो टन कचऱ्याची निर्मितीही होते आहे. पर्यावरणीयदृष्ट्या विघटनास अवघड असलेल्या कपड्याच्या कचऱ्याचे करायचे काय... हा नवा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. ................ देशातील वाढता ई-कचरा, जैववैद्यकीय कचऱ्याची दखल घेऊन केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने काही दिवसांपूर्वीच या कचऱ्याच्या विल्हेवाटीची नियमावली जाहीर केली आहे. त्यापाठोपाठ शहरातील राडारोडा आणि ओला-सुक्या कचऱ्यासंदर्भातील निमयावली प्रसिद्ध झाली आहे. पुढील दहा ते पंधरा वर्षांत या सर्वांबरोबरच कपड्यांच्या कचऱ्याला सामोरे जावे लागणार आहे. पर्यावरणीयदृष्ट्या धोकादायक असलेल्या या कचऱ्याला पेलण्यासाठी आत्तापासूनच खरे तर स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरज आहे. आपण दररोज वापरणारे कपडे खराब झाल्यावर अनेकदा गरजू व्यक्ती, भांडी विकणाऱ्या बाईला देतो किंवा थेट फेकून देतो. पुढे या ...